आयपीएल २०२६ : बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांमुळे भारतात राजकीय वातावरण तापलं असून बांगलादेश सोबतच्या संबंधांमध्ये सुद्धा तणाव निर्माण झालेला आहे. शनिवारी बीसीसीआयने (BCCI) मोठा निर्णय घेत बांगलादेशचा क्रिकेटर मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलमधून बाहेर करण्याचे निर्देश दिले. कोलकाता नाईट रायडर्सने बीसीसीआयच्या निर्देशांचे पालन करत मुस्तफिजूरला संघातून रिलीज केलं. 16 डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएल 2026 च्या ऑक्शनमध्ये मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) हा एकमेव बांगलादेश खेळी होता ज्यावर फ्रेंचायझीने बोली लावून त्याला संघात घेतलं होतं. मुस्तफिजूरवर केकेआरने 9.20 कोटींची बोली लावली होती.
मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमधून बाहेर केल्यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा तळतळाट झालाय. रिपोर्ट्समधून समोर आलंय की बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आयसीसीला पत्र लिहिलंय, ज्यात त्यांनी बांगलादेशचे भारतात होणारे सामने हे श्रीलंकेला शिफ्ट करण्याची मागणी केलीये. आयसीसीने अद्याप या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र बांगलादेशने यापूर्वीच आणखी एक मोठं पाऊल उचलण्याची योजना आखल्याची माहिती मिळतेय.
बांगलादेशमध्ये आयपीएलचं प्रसारण होणार नाही :
बांगलादेश सरकारचे सल्लागार आसिफ नजरुलने आधीच मागणी केलीये की बांगलादेशचे टी २० वर्ल्ड कप 2026 सामने हे श्रीलंकेत शिफ्ट केले जावेत. जसं पाकिस्तानच्या सामन्यांचं करण्यात आलं. बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण स्थगित करावे अशी विनंती त्यांनी बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सल्लागारांना केली आहे, असेही आसिफ नजरुलने म्हटले.
आसिफ नजरुल म्हणाले, ‘मी माहिती आणि प्रसारण सल्लागारांना बांगलादेशमध्ये आयपीएलचे प्रसारण बंदी घालण्याची विनंती केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बांगलादेशी क्रिकेट, क्रिकेटपटू किंवा बांगलादेशचा अनादर सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस आता संपले आहेत’.
हेही वाचा : भारतासोबत तणावस्थिती असताना टी20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूला केलं कर्णधार
काय म्हणाला मुस्तफिजुर?
आयपीएलच्या 19 व्या हंगामातील बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानच्या सहभागावरून वाद निर्माण झाला होता. अनेक राजकीय पक्षांनी त्याच्या खेळण्यावर आक्षेप नोंदवला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्याला संघातून वगळण्याचे निर्देश फ्रँचायझीला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान BDCricTime शी संवाद साधताना मुस्तफिजुरने सांगितलं की, ‘जर त्यांनी मला करारमुक्त केलं असेल, तर मी काय करू शकतो?’ भारत आणि बांगलादेश यांच्यातील वाढत्या राजकीय तणावामुळे घेतलेल्या या निर्णयामुळे मुस्तफिजुर निराश झाल्याचेही वृत्त आहे.






























