नेपाळ जनरल झेड निषेध हिंसाचारावरील पंतप्रधान मोदी: भारताचा शेजारच्या नेपाळमधील सरकार कोसळलं आहे. सोशल मीडियावरील बंदी आणि त्यामधून भ्रष्टाचाराविरोधात येथील तरुणाई रस्त्यावर उतरल्याने मोठ्याप्रमाणात हिंसाचार आणि जाळपोळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 20 आंदोलकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अगदी माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या पत्नी राजलक्ष्मी यांना आंदोलकांनी जिवंत जाळल्याची घटनाही मंगळवारी समोर आली. दुसरीकडे राज्यकर्त्यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर येथील लष्कराने मंगळवारी रात्री 10 वाजल्यापासून देशाचा कारभार हाती घेतल्याची घोषणा केली आहे. असं असतानाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील परिस्थितीवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मोदींनी बोलावली विशेष बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील हिंसाचारासंदर्भात चर्चा करण्यासाठी रात्री एक विशेष बैठक बोलावली होती. मोदींनी नेपाळमधील शांततेवर भाष्य केलं आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये नेपाळमध्ये शांतता परतेल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोदी नेमकं काय म्हणाले?
रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. “आज हिमाचल प्रदेश आणि पंजाबहून परतल्यावर, सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत नेपाळमधील घडामोडींवर चर्चा झाली. नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे,” असं मोदींनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी, “अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत हे पाहून मला दुःख झाले आहे. नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मी नेपाळमधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना शांततेला पाठिंबा देण्याचे नम्र आवाहन करतो,” असंही म्हटलं आहे.
आज हिमाचल प्रदेश आणि पंजाब येथून परत आल्यावर, सुरक्षा विषयावरील कॅबिनेट समितीच्या बैठकीत नेपाळमधील घडामोडींवर चर्चा झाली. नेपाळमधील हिंसाचार हृदयविकाराचा आहे. मला त्रास झाला आहे की बर्याच तरुणांनी आपला जीव गमावला आहे. ची स्थिरता, शांतता आणि समृद्धी…
– नरेंद्र मोदी (@narendramodi) 9 सप्टेंबर, 2025
ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भारत सरकारला नेपाळबरोबर मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यात अपयश आल्याचं म्हटलं आहे. नेपाळला आता चीन अधिक जवळचा वाटू लागल्याचा उल्लेख ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. “भारतात मोठ्या प्रमाणात नेपाळची जनता रोजगार कमवीत आहे, पण नेपाळवर पूर्ण नियंत्रण आहे ते चीनचे. नेपाळची अर्थव्यवस्था चीनच्या मदतीवर अवलंबून आहे. एकेकाळी नेपाळ, भूतानसारखी राष्ट्रे भारताचे विश्वासू मित्र होती. नेपाळात नवे सरकार आले की, तेथील पंतप्रधान सगळ्यात आधी भारत भेटीवर येत. आज नेपाळचे पंतप्रधान आधी चीन दौऱ्यावर व नंतर पाकिस्तानात जातात. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. शेकडो चिनी शिक्षक सध्या नेपाळात आहेत व नेपाळची जनता त्यांच्याकडून चिनी भाषेचे धडे घेत आहे. नेपाळचा रंग आधी भगवा होता. तो आता पूर्णपणे लालभडक झाला व भारत सरकार हा बदल रोखू शकले नाही,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
FAQ
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावली होती?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळमधील हिंसाचारासंदर्भात चर्चा करण्यासाठी रात्री एक विशेष बैठक बोलावली होती.
या बैठकीत कोणत्या समितीने भाग घेतला?
या बैठकीत सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने (Cabinet Committee on Security) भाग घेतला होता.
पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील परिस्थितीबाबत काय म्हटलं आहे?
पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील हिंसाचाराला “हृदयद्रावक” असं संबोधलं आहे. त्यांनी अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं नमूद केलं आहे.
































