महाराष्ट्र (कोल्हापूर) : कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षावर नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शिंदे गटाकडून त्यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपानंतर आणि सुनील प्रभू यांच्या प्रयत्नानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संभाव्य युतीच्या चर्चा महाराष्ट्रात सुरू असतानाच, कोल्हापुरात मात्र अंतर्गत बंडाची ठिणगी पडली होती. कोल्हापूच्या जिल्हाध्यक्षपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती झाल्यानंतर संजय पवार नाराज झाले होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केल्यानंतर संजय पवार यांची नाराजी दूर झाली.
शिंदे गटाची ऑफर आणि ठाकरेंचा हस्तक्षेप
संजय पवार यांनी पक्षावर नाराजी दर्शवत राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटाने ही संधी साधली. मंत्री उदय सामंत यांनी पवारांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशाची थेट ऑफर दिली. मात्र, ठाकरे गटानेही वेळ न दवडता हालचाली सुरू केल्या. पक्ष नेते सुनील प्रभू यांनी संजय पवार यांच्याशी संपर्क साधत चर्चा केली. त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी संजय पवार यांच्याशी फोनवर संवाद साधत चर्चा केली.
बुधवारी मातोश्रीवर घेणार ठाकरेंची भेट
उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर संजय पवार यांची नाराजी दूर झाली असून, बुधवारी दुपारी साडे बारा वाजता ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. या बैठकीत कोल्हापूरमधील राजकीय घडामोडींसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती आणि पक्षातील अंतर्गत समन्वयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
संजय पवार रागावला असता?
संजय पवार यांची नाराजी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी रविकिरण इंगवले यांची झालेली नियुक्ती ही मुख्य कारण ठरली. पक्षाने आपल्याला विश्वासात घेतले नाही, असा आरोप करत पवारांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. “मी 1990 पासून शिवसैनिक असून काम केले. गेली 36 वर्षे मी एकनिष्ठपणे काम केले. मातोश्रीवरून जे आदेश येतील त्याचे तंतोतंत पालन केले. पण गेली 10 वर्षे बघितले तर काही वेगळे घडत गेले. जिल्हाध्यक्षपदाची निवड करताना विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासायला हवी. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक अनेक होते, पण नियुक्ती करताना उपनेत्याला देखील माहिती नसेल तर काय करायचे? असा सवाल करत आपण शिवसेना उपनेतेपदाचा मी राजीनामा देत असल्याचे संजय पवार म्हणाले होते.
हे ही वाचा…
5 तारखेला वाजत गाजत गुलाल उधळत या:राज – उद्धव ठाकरे यांचे संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला विजयी मेळाव्याला येण्याचे आवाहन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे मराठी जनतेला 5 जुलैच्या विजयी मेळाव्याला वाजत – गाजत येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे हे दोन्ही भाऊ या मेळाव्याच्या निमित्ताने एका व्यासपीठावर येणार हे स्पष्ट झाले आहे. विशेषतः ठाकरे बंधू केव्हा एकत्र येणार? हा अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्नही या निमित्ताने निकाली निघाला आहे.





























