शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर थेट आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत. त्यांनी मर्डर केले, भानगडी केल्या, तुरुंगातही गेले, अशा थेट शब्द
?
मंत्री भरत गोगावले पुढे म्हणाले, शिवसेनेत भानगडी केल्याशिवाय नेता घडत नाही. केसरकरसाहेब भानगडी करत नाहीत, म्हणून त्यांना अडचणी येतात. पण नीलेश राणे यांचे वेगळे आहे. आता मात्र भानगडी करण्याचे दिवस संपले आहेत. आपण सर्वांनी एकत्र काम करायचं आहे, असे त्यांनी शनिवारी सायंकाळी कुडाळ पावशी येथे पार पडलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात हे वादग्रस्त विधान केले आहे.
सगळे काही झाले
भरत गोगावले म्हणाले की, नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेले नाहीत. अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, मर्डर… सगळे झालेले आहे. हे वेगळे कोणी सांगायची आवश्यकता नाहीये. भानगडी करा असे सांगत नाही आम्ही, जुळवून घ्यायचे. पण त्यांच्याही काही मंडळींनी थोडे आम्हाला पण जुळवून घ्यायला पाहिजे. हा आमचा सल्ला आहे.
कोकणात शिंदे गट एक नंबर
भरत गोगावले म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण गेले अनेक वर्ष पाहतोय. नीलेश राणेंच्या रुपाने सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाली आहे. महायुती सगळीकडे जमेलच असे नाही. पण कोकणात शिंदे गट नंबर वन आहे. काही पक्ष आपण शत प्रतिशत आहोत असं म्हणतात. मग आम्ही पण शत प्रतिशत जाऊ शकत नाही का?आम्ही तुमचे काम करणारे, मनाने श्रीमंत लोक आहोत. आमचे शिवसैनिकपण ‘भानगड’ या शब्दाशीच जोडलेले आहे. आम्हाला तुम्ही निवडून दिलात आता त्याची परत फेड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. येत्या चार महिन्यात निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना अत्यंत सावध रहावे लागते. तुम्हाला लागेल ती ताकद देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत.
आम्ही गरिबांचे शेठ
भरत गोगावले म्हणाले की, आम्ही गरिबांचे शेठ आहोत, श्रीमंताचे नाही. आमच्याकडे मनाची श्रीमंती आहे. आम्ही पालकमंत्री पण होऊ, आम्ही काम करतोय. त्याचा मोबदला मागतोय.































