महाराष्ट्र : शिवसेना एमएनएस अलायन्स: उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्याचा दुस-यांदा प्रस्ताव दिल्यानंतरही मनसेनं सावध पवित्रा घेतलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युती करण्यासाठी एवढी आतूर का झालीये असा सवाल मनसेनं विचारलाय. आत्ता 20 आमदार आहेत, 60 आमदार असते तर ते युतीसाठी तेवढेच आतुर असते का? असा सवालही त्यांनी विचारलाय.
उद्धव ठाकरेंनी मनसेशी युती करण्यासंदर्भात सलग दुस-यांदा जाहीर वक्तव्य केलंय. युतीसाठी उद्धव ठाकरे स्वतः किती उत्सुक आहेत याचे एकप्रकारे संकेतच त्यांनी दिले. उद्धव ठाकरेंचा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उत्साह पाहून मनसैनिकांना आणि मनसेला आनंद होईल असा अंदाज होता. पण मनसेला शिवसेनेच्या या आनंदामागं थोडासा संशय वाटू लागलाय. युतीसाठी उद्धव ठाकरेंचा उत्साह गेल्या 19 वर्षांत का दिसला नाही? असा प्रश्न मनसेनं विचारलाय.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आताच मनसे का आवडू लागली असा सवाल मनसेनं विचारलाय. मनसैनिकांनी बाळासाहेबांचा फोटो वापरु नये असं संजय राऊत सहा महिन्यापूर्वी सांगत होते असा आरोपही मनसेनं केलाय. फक्त 20 आमदार निवडून आल्यानं ठाकरेंच्या पक्षाला मनसे जवळची वाटू लागली आहे का असा सवालही त्यांनी विचारलाय.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची घोषणा झालेली नसताना ठाकरेंचे शिवसैनिक राज्यभर बॅनरबाजी करायला लागलेत. ही बॅनरबाजी करुन युतीसाठी मनसेवर आणि राज ठाकरेंवर दबाव आणला जातोय का असं मनसे विचारु लागलीये.
युतीसाठी शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंचा जेवढा उत्साह आहे तेवढा उत्साह ना मनसैनिकांत आहे ना राज ठाकरेंमध्ये. राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरेंचं हे बंधूप्रमे शांतपणे पाहतायेत. उद्धव ठाकरेंनी जाहीर युतीचे संकेत दिल्यानंतर मनसेची जी प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया मात्र शिवसैनिकांना विचार करायला लावणारी आहे.





























