महाराष्ट्र : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याच्या राजकारणात सध्या उलथापालथ सुरू असून, राजकीय नेत्यांच्या पक्षांतराच्या घडामोडी वाढत आहेत. कोण कधी कोणत्या पक्षात जाणार, कोण कोणासोबत युती करणार हे सांगता येत नाही. नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तर सांगलीतील काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत काँग्रेसमध्ये आता ना नेतृत्व उरलं आहे, ना दिशा, असा थेट हल्लाबोल केला आहे.
नेमके काय म्हणाले अशोक चव्हाण?
काँग्रेसची अवस्था ही नात्यागोत्याचा पक्ष असल्यासारखी झाली असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले. काँग्रेसकडे प्रेरणा देण्यासारखे काम नाही, रोड मॅप तयार करावा लागतो, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. तसेच, काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे, हेच यामागचे प्रमुख कारण असल्याचेही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, काँगेसच्या काळात विकास झाला, मात्र त्यापेक्षा दुपटीने मागच्या अकरा वर्षात देशाचा विकास झाला. मी काँगेस मध्येच होतो. काँग्रेसच्या काळात विकास झाला नाही का? या प्रश्नाचा रोख माझ्याकडेच आहे, हे मला कळले, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला. काँग्रेसच्या काळात ही विकास झाला, मात्र मागच्या अकरा वर्षात झालेला विकास हा अधिक गतीने झाला, असे अशोक चव्हाण म्हणाले. आज जमाना आयपीएलचा आहे. त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047 पर्यंत करण्याचे धोरण ठेवल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशाची तारीख ठरली
जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. यानंतर त्यांनी स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आपले पुढील राजकीय निर्णय ठरवण्यास सुरुवात केली.
जयश्री पाटील यांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर मिळाल्या होत्या. अखेर त्यांनी भाजपचा पर्याय निवडला. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत भाजप प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली असून, येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत.





























