राजा रघुवन्शी प्रकरण नवीन अद्यतन: इंदोरमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या गाजीपूर येथून सोनमसह चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान सोनमने मोठा खुलासा केला आहे. सोनमने पहिल्यांदाच पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला असून, माझा पती राजा रघुवंशीची हत्या काही अज्ञात संशयित लोकांनी केल्याचा दावा केला आहे. माझं अपहरण करण्यात आलं होतं, त्यानंतर मला एका खोलीत बंद करण्यात आलं होतं. कारमध्ये बसवून मला एका ढाब्याच्या बाहेर सोडण्यात आलं असं तिने जबाबात सांगितलं आहे.
सोनमने सांगितलं की, रविवारी रात्री तिला ढाब्यावर आणण्यात आलं होतं. तिचं म्हणणं आहे की, मी रात्री ढाबा मालकाचा फोन घेऊन माझ्या भावाला फोन केला होता. त्यानंतर पोलीस आले आणि मला अटक केलं. सोनम रघुवंशी सध्या गाजीपूर येथे आहे, जिथे पोलीस सोनमला कोर्टात हजर करणार आहेत. यानंतर तिला मेघालयला नेलं जाणार आहे.
सोनमसहित पाच जणांना अटक
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत सोनमसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी तीन आरोपींना मध्य प्रदेशातून आणि एका आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. राज कुशवाहाला इंदोरमधून, विशाल उर्फ विक्की ठाकूरला इंदोरमधून, आकाश राजपूतला ललितपूरमधून, आनंदला बिना (मध्य प्रदेश) मधून आणि सोनम रघुवंशीला यूपीतील गाजीपूरमधून अटक करण्यात आली आहे. यानंतर आणखी अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात.
काय आहे नेमकं प्रकरण?
राजा आणि सोनमचे 11 मे रोजी लग्न झालं आणि 20 मे रोजी ते मेघालयात हनिमूनसाठी निघाले. त्यानंतर एक दिवस ते राजधानी शिलाँगमध्ये होते. 23 मे रोजी, एका होमस्टेमधून बाहेर पडल्यानंतर, दोघेही बेपत्ता झाले. त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर जवळच्या गावात सोडून दिलेली आढळली.
अनेक दिवसांच्या शोधानंतर, 2 जून रोजी राजाचा मृतदेह एका दरीत सापडला. पोलिसांना राजाच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार, चाकू देखील सापडला. दोन दिवसांनंतर, पोलिसांना एक रक्ताचे डाग असलेला रेनकोट सापडला, जो आकाराने खूप मोठा होता. त्यामुळे बेपत्ता पत्नी सापडण्याची आशा निर्माण झाली.
8 जूनपर्यंत सोनमचा पत्ता लागला नाही, त्यानंतर तिने तिच्या भावाला फोन केला आणि त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तिला घेऊन गेले.



























