U19 आशिया कप 2025 फायनल: रविवार 21 डिसेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात अंडर 19 आशिया कप 2025 या (U19 Asia Cup 2025) स्पर्धेचा फायनल सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 191 धावांनी दारुण पराभव केला. सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशन सेरेमनीने पुन्हा एकदा क्रिकेट जगतात वाद निर्माण झाला आहे. आशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवीने (Moshin Naqvi) विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडल दिले. मात्र या सेरेमनी दरम्यान भारतीय क्रिकेट संघातील कोणताही सदस्य तिथे उपस्थित नव्हता. ही स्थिती असामान्य आहे कारण साधारणपणे उपविजेत्या संघाचे खेळाडू सुद्धा या सेरेमनीचा भाग असतात. भारतीय संघाचा कोणताही सदस्य किंवा प्रतिनिधी येथे उपस्थित नसल्याने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मीरवाइस अशरफ उपविजेत्या संघाला दिला जाणारा चेक स्वीकारला.
मोहसिन नकवीची दुहेरी भूमिका :
मोहसिन नकवीकडून भारतीय क्रिकेट संघाने पुरस्कार न स्वीकारण्याची घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. यापूर्वी सिनियर आशिया कप 2025 दरम्यान भारताने पाकिस्तानला फायनलमध्ये पराभूत केले. त्यानंतर विजेतेपदाची ट्रॉफी आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री असलेल्या मोहसिन नकवीकडून स्वीकारणार नाही असा निर्णय टीम इंडियाने घेतला होता. एवढंच नाही तर या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तान संघाच्या खेळाडूंशी हॅन्डशेक सुद्धा केला नाही. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाने हा निर्णय घेतला होता. यावेळी मोहसिन नकवीने आडमुठेपणा करून भारतीय संघाला त्यांनी जिंकलेली विजेतेपदाची ट्रॉफी दिली नाही. अद्याप सुद्धा ही ट्रॉफी मोहसिन नकवीने टीम इंडियाला किंवा बीसीसीआयला सुपूर्द केलेली नाही. आयसीसी बैठकांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली मात्र दोन्ही पक्षांमध्ये याबाबत ठोस सहमती झालेली नाही.
हेही वाचा : ‘या’ घटनेनंतर रोहित शर्मा घेणार होता निवृत्ती, हिटमॅनने स्वतः केला खळबळजनक खुलासा
रविवारी भारत – पाक फायनलमध्ये काय घडलं?
भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात अंडर 19 आशिया कप 2025 चा फायनल सामना दुबईत खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने तब्बल 191 धावांनी भारताचा पराभव केला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात आठ विकेट्सनी शानदार विजय मिळवून अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानने भारतीय गोलंदाजांना वर्चस्व गाजवू दिले नाही. समीर मिन्हास वगळता पाकिस्तानकडून उस्मान खानने 35, अहमद हुसेन 56, फरहान युसूफ 19, हमजा जहूरने 18 धावा केल्या. तर भारतीय गोलंदाज दीपेश देवेंद्रनने 3 विकेट्स, खिलम पटेल आणि हेनिल पटेलने प्रत्येकी 2 विकेट, कनिष्क चौहानने 1 विकेट घेतल्या. तर भारताकडून फलंदाजीत दीपेश देवेंद्रन (36) वगळता इतर कोणताही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकला नाही.
पाकिस्तानचा गोलंदाज अली राझाने 4 विकेट, मोहम्मद सय्यम, अब्दुल सुभान, हुजैफा अहसानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. पाकिस्तानने फायनलमध्ये 347 धावांचा मोठा स्कोअर उभा केला, टीम इंडियाला विजयासाठी 348 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान पूर्ण करण्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेच्या ओपनिंग जोडीने भारताला वेगवान सुरुवात करून दिली. मात्र दोघे बाद झाल्यावर टीम इंडियाची मिडल ऑर्डर कोलमडली आणि संपूर्ण संघ 26.2 ओव्हरमध्ये 156 धावांवर ऑलआउट झाला.






























