आयआरसीटीसी कात्रा ते श्रीनगर ट्रेनची वेळ: टप्प्याटप्प्यानं नवी उंची गाठणाऱ्या भारतीय रेल्वेनं आता कैक वर्षांपारून प्रत्येक भारतीयानं पाहिलेलं स्वप्न साकारलं असून, देशाच्या उत्तरेकडील टोकापर्यंत पोहोचणं साध्य करून दाखवलं आहे. रेल्वेनं केलेली ही किमया पाहता काही तासांमध्येच काश्मीरच्या खोऱ्याशी कोट्यवधी भारतीय जोडले जाणापर असून, उधमपुर-श्रीनगर-बारामूला रेल्वे लिंकचं(USBRL) लोकार्पण होईल. ज्यामुळं जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून रेल्वे धडधडकरत अपेक्षित स्थानी पोहोचेल.
रेल्वेचं वेळापत्रक जाहीर…
कटरा ते श्रीनगर आणि याच मार्गावरून परतीच्या प्रवासासाठी या मार्गावर वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी रेल्वे मंत्रालयाकडून वंदे भारतसाठीचं नवं वेळपत्रक जारी केलं आहे. या प्रवासादरम्यान कटरा, बनिहाल, श्रीनगर अशी तीन स्थानकं असतील. रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार चार वंदे भारत रेल्वेंना मान्यता देण्यात आली आहे.
किती असतील तिकीट दर?
या मार्गावर वंदे भारतसाठी एकूण दोन प्रकारची तिकीटं उपलब्ध असतील. यामध्ये चेअर कारचं भाडं 555 रुपये इतकं असेल. तर, दुसरी श्रेणी असेल एक्झीक्युटीव्ह. ज्याचं तिकीट भाडं 1070 रुपये इतकं असेल. माता श्री माता वैष्णो देवी कटरा रेल्वे स्थानकातून श्रीनगर रोखानं ही ट्रेन 14.55 वाजता रवाना होईल आणि सायंकाळी 18.00 वाजता निर्धारित स्थानी पोहोचेल. या रेल्वेप्रवासादरम्यान रेल्वेकडून प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. हा प्रवास अवघ्या तीन तासांचा असला तरीही त्यादरम्यान प्रवाशांना अविस्मरणीय अनुभव मिळणार असून, जगातील सर्वात उंच रेल्वेपुलावरून प्रवासाची संधीसुद्धा मिळणार आहे.
हेसुद्धा वाचा : Explained: आता IRTC वर सहज मिळणार तिकीट? दलालांवर रेल्वेने कसा केला डिजिटल स्ट्राईक?
दरम्यान, सध्या आयआरसीटीसीकडून रेल्वे तिकीट आरक्षण प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न सुरू असून त्याअंतर्त तंत्रज्ञानावर आधारित अशी प्रणाली सुरू करण्यात आली आहे जिथं एजंटची मक्तेदारी संपुष्टात येणार असून तिकीट आरक्षणावेळी सामान्यांना सहजपणे तिकीटांची उपलब्धता दिसून येईल असं म्हटलं जात आहे. तेव्हा आता या विशेष वंदे भारतनं प्रवास करण्याची संधी हातची जाऊ देऊ नका.






























