महाराष्ट्र (मुंबई) : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती दिली.
मराठी ही प्रथम भाषा म्हणून आठवड्याला १५ तास शिकवली जाणार आहे. इतर भारतीय भाषा, जसे की हिंदी, उर्दू, कन्नड, इ. तृतीय भाषा म्हणून ऐच्छिक असतील. तिसऱ्या भाषेसाठी २० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक नियुक्त केले जातील, अन्यथा डिजिटल शिक्षणाची सुविधा दिली जाईल.
राज्यात १.०८ लाख शाळांमध्ये २.११ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या ८५ हजारांहून अधिक शाळा आहेत. तिसऱ्या भाषेचे शिक्षण इयत्ता पहिलीपासून दिल्यास विद्यार्थ्यांना ‘अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट’ प्रणालीअंतर्गत क्रेडिट पॉइंट्स मिळतील, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर शिकवला जाणार असून, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्रीय शाळांमध्येही मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.































