राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हुंडाबळी विरोधात 22 जूनपासून राज्यव्यापी अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. यासंबंधी त्यांनी हुंडामुक्त महाराष्ट्र – हिंसामुक्त कुटुंब असा नारा दिला आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे ह
?
सुप्रिया सुळे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, महाराष्ट्राची लेक स्व. वैष्णवी कसपटे- हगवणे हिचा अतिशय वेदनादायक पद्धतीने हुंडाबळी झाला. ही घटना मनाला प्रचंड वेदना देणारी घटना आहे. ज्या राज्याने स्त्री-मुक्तीच्या दृष्टीने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले, तिथे वैष्णवी सारख्या लेकीचा बळी जाणे हे अतिशय संतापजनक आहे. कोणत्याही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारे आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र आज सुन्न झाला आहे. त्यासाठी केवळ संताप आणि दुःख व्यक्त करून भागणार नाही तर एक कृतीशील प्रभावी पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यासाठी मी 22 जून 2025 पासून राज्यात हुंडाबळी व हिंसामुक्त महाराष्ट्रासाठी लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. समाजातील सर्व घटकांनी व यंत्रणांनी यात सहभाग घ्यावा. या मोहिमेतूनच “हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचे” उद्दिष्ट सध्या करता येईल. वैष्णवीला तीच खरी श्रद्धांजली ठरेल.
आपल्याला अनिष्ट प्रथा संपवण्यात अपयश
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, 3 दशकांपूर्वी महाराष्ट्र राज्याने देशातील पहिले महिला धोरण 22 जून 1994 रोजी शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने जाहीर केले. ते धोरण तयार करण्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व घटकांनी आणि यंत्रणांनी आपले योगदान दिले होते. त्यामुळे राज्यातील महिलांच्या जीवनात अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक बदल घडले. परंतु तरीही हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा, महिलांना सहन करावा लागणारा कौटुंबिक हिंसाचार आपण थांबवू शकलो नाही. हे वास्तव आहे.
महाराष्ट्र हा शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी घडलेला आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर अशा तेजस्वी आणि कर्तृत्ववान महानुभावांची परंपरा या राज्याला आहे. गेली 50 वर्षे राज्यामध्ये विविध संस्था, संघटना आणि व्यक्ती स्त्री पुरुष समतेची चळवळ कष्टाने आणि नेटाने पुढे नेत आहेत. हे सर्व पूर्वसंचित सोबत घेऊन मी 22 जूनपासून पुण्यातून या मोहिमेची सुरुवात मी करत आहे.
वर्षभर राज्याच्या विविध भागांत राबवली जाणार मोहीम
प्रस्तुत मोहीम संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या टप्प्यांत राज्याच्या सर्व भागात राबवण्यात येईल. या मोहिमेचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत. त्यामुळे याबाबतच्या सूचनांचे आणि कृतिशील सहभागाचे आवाहन मी सर्वांना करत आहे. सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन “हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसाचार मुक्त कुटुंब” घडविण्यासाठी एकदिलाने काम करूया, असे त्या म्हणाल्या.





























