T20 विश्वचषक गौतम गंभीर: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. खरं तर त्यांच्यासंदर्भातील चांगल्या गोष्टी असोत किंवा वाईट, कोणत्याही कारणामुळे गौतम गंभीर चर्चेत राहू शकतो असं मागील काही काळापासून दिसून येत आहे. सध्या गंभीर चर्चेत असण्याचं कारण ठरत आहे त्याचं सोशल मिडिया अकाऊंट! काही दिवसांपूर्वी, मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीरने काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) केलेल्या एका पोस्टला उत्तर दिले होते. थरूर यांनी म्हटले होते की, पंतप्रधानपदानंतर भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकाचं पद स्वीकारणं हे देशातील दुसरे सर्वात कठीण काम आहे. थरूर यांच्या या पोस्टला गौतम गंभीरनेही रिप्लाय दिला होता. गंभीरने दिलेल्या उत्तरात त्याने प्रशिक्षकाला ‘अमर्याद अधिकार’ मिळतात हा चुकीचा समज असल्याचं म्हटलं होतं. मात्र गंभीरने केलेल्या रिप्लायवर भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेनं नाराजी व्यक्त करत एक सल्ला दिला आहे.
थरुर काय म्हणालेले?
थरूर यांनी नागपूरमधील सामन्यादरम्यान गौतम गंभीरची भेट घेतली होती. तेव्हा गंभीरबरोबर काढलेला सेल्फी पोस्ट करत त्यांनी सोशल मीडियावर,”नागपूरमध्ये, माझा जुना मित्र आणि पंतप्रधानांनंतर भारतातील सर्वात कठीण काम करणाऱ्या गौतम गंभीरबरोबर सकारात्मक आणि मनमोकळी चर्चा करण्याचा आनंद घेतला! दररोज लाखो लोक त्याच्याबद्दल उलटसुलट बोलत आहेत, पण तो शांत राहतो आणि निर्भयपणे पुढे चालत राहतो. त्याच्या शांत निश्चयी वृत्ती आणि सक्षम नेतृत्वाबद्दल माझ्याकडून हे कौतुकाचे दोन शब्द. त्याला वर्ल्डकपच्या पूर्वी म्हणजेच आजपासूनच सर्व यशासाठी शुभेच्छा!” असं म्हटलं होतं.
गंभीरने आपले संपूर्ण लक्ष…
गंभीरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, रहाणेनेनं गंभीरने फेब्रुवारीपासून सुरु होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा संपेपर्यंत सोशल मीडियापासून दूर रहावे असा सल्ला दिला आहे. मायदेशात होणारा टी-20 विश्वचषक हा आगामी काळात भारतीय संघासमोरील मोठं आवाहन ठरणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची सध्या सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेकडे या मोठ्या स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. पण, टी-20 विश्वचषक सुरू व्हायला अजून काही आठवडे बाकी असताना, गंभीरला आपले संपूर्ण लक्ष संघावर केंद्रित करण्याचा आणि सोशल मीडियावर लक्ष न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
गंभीरने हे केलं तर भारतीय संघाला फायदा होईल
“यावर माझे एकच उत्तर आहे की, गौतम गंभीरने सोशल मीडियापासून दूर राहावे. लोक त्याच्याबद्दल काय बोलत आहेत किंवा त्याला काय सांगत आहेत याचा त्याने जास्त विचार करू नये. तो खेळाडू म्हणून कायमच उत्तम प्रकारे क्रिकेट खेळला आहे. आता तो टीम इंडियाला प्रशिक्षण देतोय. भारतीय संघाचा प्रशिक्षक हे फारच जबाबदारीचे काम आहे,” असे रहाणेने ‘क्रिकबझ’शी चर्चा करताना सांगितले. गंभीरने वर्ल्डकपची स्पर्धा संपेपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहण्याचं ठरवलं तर याचा त्याला आणि पर्यायाने संघाला खूप फायदा होईल असं अजिंक्यने म्हटलं आहे.
“त्याने सोशल मीडियापासून दूर राहावे आणि संघावर लक्ष केंद्रित करावे. हे माझे वैयक्तिक मत आहे. संघ म्हणून टीम इंडियाने मुख्य गोष्टीवर लक्ष केंद्रित करा; विश्वचषक संपेपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहा,” असा सल्ला रहाणेनं दिला.






























