पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक जेसन गिलेस्पीने T20 WC वरील पोस्ट हटवली: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आणि पाकिस्तानचा माजी मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीने आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेशला वगळण्यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मात्र नंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. ही पोस्ट डिलीट का केली यासंदर्भात त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्याला ऑनलाइन फार शिवीगाळ करण्यात आल्याचं आणि टीका झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) निर्णय प्रक्रियेबद्दल आपली उत्सुकता व्यक्त करण्यासाठी गिलेस्पीने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली होती.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात प्रवास करण्याबद्दल चिंता व्यक्त केल्यामुळे आणि त्यांचे सामने श्रीलंकेसारख्या तटस्थ ठिकाणी हलवण्याची विनंती केल्यामुळे, टी-20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी देण्यात आली आहे.
आता डिलीट झालले्या पोस्टमध्ये गिलेस्पीने विचारलं होतं की, “बांगलादेश त्यांचे सामने भारताबाहेर का खेळू शकला नाही, याचे स्पष्टीकरण आयसीसीने दिले आहे का? माझ्या आठवणीनुसार, भारताने पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळण्यास नकार दिला होता आणि त्यांना ते सामने पाकिस्तानबाहेर खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. कोणीतरी मला हे समजावून सांगेल का?”
जेसन गिलेस्पीने आज X वरील आपली पोस्ट हटवली ज्यात त्याने बांगलादेशला भारताबाहेर खेळू न दिल्याबद्दल आयसीसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. का @dizzy259 ? pic.twitter.com/WyA4Qwdhmr
— CricFollow (@CricFollow56) 25 जानेवारी 2026
गिलेस्पीचा प्रश्न सामने हलवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निकषांना समजून घेण्याच्या उद्देशाने विचारलेला दिसत होता, आणि त्याने नमूद केले की भूतकाळात इतर संघांसाठीही अशाच प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती.
त्या पोस्टनंतर, 50 वर्षीय गिलेस्पीला तीव्र टीकेला सामोरे जावे लागले, ज्यामुळे त्याला ती पोस्ट काढून टाकावी लागली. जेव्हा एका सोशल मीडिया युजरने त्याला विचारलं की त्याने ती पोस्ट का हटवली? तेव्हा गिलेस्पी म्हणाला: “कारण एक साधा प्रश्न विचारल्याबद्दल मला शिवीगाळ करण्यात आली, म्हणूनच”.
कारण एक साधा प्रश्न विचारल्याबद्दल मला शिवीगाळ झाली.
— जेसन गिलेस्पी (@dizzy259) 25 जानेवारी 2026
बीसीबीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर आयसीसीने शनिवारी बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडची अधिकृतपणे निवड केली. एका सविस्तर निवेदनात, त्यांनी स्पष्ट केलं की, तीन आठवड्यांच्या विस्तृत चर्चेनंतर स्पर्धेच्या वेळापत्रकाची पवित्रता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे: “आयसीसीने बीसीबीने उपस्थित केलेल्या चिंतांचा आढावा घेतला, अंतर्गत आणि बाह्य तज्ञांकडून स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकने करून घेतली आणि त्यांचा विचार केला, तसेच केंद्र आणि राज्य स्तरावरील व्यवस्था, तसेच स्पर्धेसाठी वाढीव आणि टप्प्याटप्प्याने वाढवल्या जाणाऱ्या सुरक्षा प्रोटोकॉलसह तपशीलवार सुरक्षा आणि कार्यप्रणाली योजना सामायिक केल्या. हे आश्वासन अनेक टप्प्यांवर पुन्हा देण्यात आले, ज्यात आयसीसी बिझनेस कॉर्पोरेशन (आयबीसी) मंडळाच्या चर्चेदरम्यानचाही समावेश आहे.”
आयसीसीच्या मूल्यांकनात असा निष्कर्ष काढण्यात आला की, भारतात बांगलादेशच्या राष्ट्रीय संघाला, अधिकाऱ्यांना किंवा समर्थकांना कोणताही विश्वसनीय आणि पडताळण्याजोगा सुरक्षा धोका नाही.






























