रोहित शर्मा T20 विश्वचषक 2026 वर: टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026)च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटमध्ये एक भावनिक चर्चा रंगू लागली आहे. T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रथमच रोहित शर्माने आपल्या भावना उघडपणे व्यक्त केल्या आहेत. त्याच्या शब्दांतून एक सल जाणवते. ही सल म्हणजे विश्वचषक खेळता न येण्याचं दु:ख. त्यातूनच चाहत्यांच्या मनात एक प्रश्न उभा राहतोय की, रोहित शर्मा आपला निर्णय बदलणार का?
विश्वविजयानंतर घेतलेला कठीण निर्णय
2024 च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवला. त्या विजयानंतर रोहित शर्माने या फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याचवेळी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही T20 ला अलविदा केल्याने भारतीय क्रिकेटमध्ये एका युगाचा शेवट झाल्याची भावना निर्माण झाली. या निर्णयानंतर अनेक चर्चा झाल्या जश्या की, संघातील बदल, पुढील नेतृत्व, आणि भारतीय क्रिकेटचं भविष्य. आता, 2026 च्या T20 विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात होत असताना, रोहितच्या भावनिक वक्तव्याने पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे.
“हा विश्वचषक वेगळा असेल…”
रोहित शर्माने स्पष्ट केलं की भारतासाठी T20 न खेळण्याचं दु:ख नाही, पण T20 विश्वचषकापासून दूर राहणं मात्र वेदनादायक आहे. तो म्हणाला, “मी जेव्हापासून T20 क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून प्रत्येक विश्वचषकात मी संघाचा भाग होतो. त्यामुळे यंदा घरातून सामने पाहणं माझ्यासाठी थोडं अजब असेल.”
सामान्य T20 सामने पाहताना वेगळी भावना नसते, पण विश्वचषकाचं वातावरण काहीसं वेगळंच असतं, असंही त्याने सांगितलं. यावेळी काही सामने तो स्टेडियममध्ये जाऊन पाहणार असल्याचंही रोहितने नमूद केलं.
आठवणी, भावना आणि भरून आलेला कंठ
विश्वचषकाच्या आठवणींबद्दल बोलताना रोहितचा कंठ दाटून आला. “यावेळी मी मैदानात नसेन, ही जाणीव मनाला लागते,” असं तो म्हणाला. प्रत्येक हंगामात मैदानात असलेला खेळाडू अचानक प्रेक्षक बनतो, तेव्हा ती भावना सहज पचणारी नसते हे त्याच्या शब्दांतून स्पष्ट होतं.
संघात संवाद महत्त्वाचा – रोहितचा ठाम मुद्दा
या चर्चेदरम्यान रोहित शर्माने संघातील संवाद आणि बॉन्डिंग यावर विशेष भर दिला. तो म्हणाला की खेळाडूंशी मोकळा संवाद असणं अत्यंत गरजेचं आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत मोहम्मद सिराजला वगळण्यात आलं होतं, तेव्हा मी व्यवस्थापनाशी बोललो. 2023 च्या विश्वचषकात युजवेंद्र चहलसोबतही अशीच परिस्थिती होती, असं त्याने उदाहरण देत सांगितलं.
“खेळाडू संघात असो किंवा नसो, त्याच्याशी संवाद तुटता कामा नये,” असं रोहित ठामपणे म्हणाला.
निवृत्तीचा निर्णय बदलणार का?
रोहित शर्माने थेट पुनरागमनाबाबत काहीही संकेत दिलेले नसले, तरी त्याच्या भावनिक वक्तव्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा निर्णय अंतिम आहे की परिस्थितीनुसार बदलू शकतो याचं उत्तर भविष्यात मिळेल. पण एक गोष्ट नक्की, T20 विश्वचषक आणि टीम इंडिया यांच्याशी रोहितचं नातं अजूनही तितकंच घट्ट आहे.





























