टीम इंडिया: भारताचा माजी गोलंदाज अमित मिश्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एमएस धोनी आणि त्याच्यातील नात्याबाबत मौन सोडलं. त्याने सुरुवातीच्या दिवसात माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोबत असलेल्या त्याच्या कनेक्शनबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. अनेकदा अशी चर्चा होते की अमित मिश्राला नेहमी धोनीचं पूर्ण समर्थन मिळालं नाही. असं सुद्धा म्हटलं जातं की रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा सारख्या दुसऱ्या स्पिनर गोलंदाजांना तो नेहमी प्राधान्य द्यायचा ज्यामुळे अमित मिश्राच्या करिअरवर परिणाम झाला. यावर अमित मिश्राने आपलं मौन सोडलं असून याबाबत त्याने खुलेपणाने आपलं म्हणणं मांडलं आहे.
धोनीबाबत काय म्हणाला अमित मिश्रा?
एक पॉडकास्टमध्ये बोलताना अमित मिश्रा म्हणाला की, ‘लोक म्हणतात की जर धोनी नसता तर माझी कारकीर्द चांगली झाली असती. पण कोणास ठाऊक, जर धोनी नसता तर मी कदाचित संघात नसतो. मिश्राने म्हटले की त्याचं भारतीय संघात झालेलं पदार्पण हेच धोनी कर्णधार असताना झालं होतं. त्याने म्हटले की, ‘मी धोनीच्या नेतृत्वाखाली संघात आलो आणि वारंवार संघात संधी मिळवत राहिलो. कर्णधार म्हणून धोनीने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मी सुद्धा तो सार्थ ठरवत गेलो. याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते’.
लोक म्हणाले की, धोनी नसता तर तुझी कारकीर्द चांगली झाली असती. कुणास ठाऊक, धोनी नसता तर कदाचित मी संघातही नसतो. pic.twitter.com/0VMzds1UAn
धोनीचा सल्ला छोटासा पण खूप प्रभावी:
नेहमी अनेकदा दुसऱ्या स्पिनर गोलंदाजांना प्राधान्य देतो या प्रश्नावर अमित मिश्रा म्हणाला की त्याला याचं अजिबात वाईट वाटलं नाही. त्याने स्पष्ट म्हटलं, ‘मला नेहमी कर्णधाराचा पाठींबा मिळाला, जेव्हाही मी प्लेईंग मध्ये असायचो, तेव्हा मला कधीच असं वाटलं नाही की धोनी माझ्याशी बोलत नाही. तो मला नेहमीच टिप्स देत असायचा आणि गोष्टी समजावून सांगायचा’. मिश्राला अजूनही न्यूझीलंडविरुद्धचा एक सामना विशेषतः आठवतो. जी त्याची शेवटची वनडे सीरिज होती आणि त्यावेळी धोनी कर्णधार होता. अमित मिश्रा म्हणाला की, ‘सामना खूपच चुरशीचा झाला. आम्ही सुमारे 260–270 धावा केल्या होत्या. जेव्हा मी गोलंदाजी करायला आलो तेव्हा मला वाटले की मी धावा थांबवाव्यात आणि विकेट घेण्याबद्दल जास्त विचार करू नये’. अमितने सांगितले की त्यावेळी धोनीचा सल्ला खूप छोटासा होता पण खूप प्रभावी होता.
हेही वाचा : 37 व्या वर्षी ‘या’ भारतीय क्रिकेटरने जाहीर केली निवृत्ती, 14 वर्षांच्या करिअरमध्ये भारतासाठी फक्त एक सामना खेळला
अमित मिश्राचं क्रिकेट करिअर :
4 सप्टेंबर 2025 मध्ये भारताचा स्टार क्रिकेटर अमित मिश्राने निवृत्ती जाहीर केली. भारताच्या माजी क्रिकेटर अमित मिश्राच्या आंतरराष्ट्रीय करिअरबद्दल बोलायचं झाल्यास त्याने 22 टेस्ट, 36 वनडे आणि 10 टी20 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने टेस्टमध्ये 76, वनडेत 64 आणि टी 20 मध्ये 16 विकेट घेतले आहेत. अमितने 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याच वर्षी त्याने शेवटचा टेस्ट सामनाही खेळला होता. 2017 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. अमित मिश्राची क्रिकेट कारकीर्द सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठी राहिली, ज्याला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिनने 16 नोव्हेंबर 2013 रोजी क्रिकेटमधील कारकीर्द संपली, त्याची 24 वर्षांची होती. तर अमित मिश्राची कारकीर्द 25 वर्षांची राहिली.






























