प्रियांका साहू | पुरी7 तासांपूर्वी
- कॉपी दुवा
गतवर्षी झालेल्या देवस्नानाचे छायाचित्र.
- स्नानासाठी सोन्याच्या विहिरीतून १०८ घागरी पाणी
- रथयात्रेत गुंडीचा मंदिराभोवतीची घरे कलिंग डिझाइनमध्ये दिसतील
आज देव पौर्णिमा आहे. रथयात्रेनंतर पुरीचा हा दुसरा सर्वात मोठा दिवस. महाप्रभू जगन्नाथ आपले बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासह गर्भगृहातून बाहेर येऊन श्रीमंदिर प्रांगणातील लाकडी मंचावर स्नान करतात. या वेळी महाप्रभू सुमारे ८५ मिनिटे स्नान करतील. श्रीमंदिराचे मुख्य प्रशासक अरविंद पाढी यांनी ‘भास्कर’ला सांगितले की, या वेळी स्नान दुपारी १२:२० ते १:४५ वाजेपर्यंत चालेल. हे मागील वेळेपेक्षा १० मिनिटांनी जास्त आहे.
या स्नानामुळे रथयात्रा उत्सव सुरू होतो,महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वर्षातील इतर महिने मंदिराची व्यवस्था महापात्र आणि ब्राह्मण सांभाळतात, परंतु देवस्नान पौर्णिमेपासून रथयात्रा परत येईपर्यंत श्रीमंदिराचे सर्व विधी दईतापती सेवकच करतात. त्यांना महाप्रभूंचे अंगरक्षक असेही म्हटले जाते. स्नान पौर्णिमामध्ये जेवढे गुप्त विधी असतात, ते सर्व हेच करतात. देवाला नैवेद्य दाखवणे असो किंवा शृंगार करणे असो, दईतापती तिन्ही देवांचे श्रीमुख झाकून हा विधी करतात.
मंदिराचे ज्येष्ठ सेवेकरी विनायक दास महापात्र सांगतात की, दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हे स्नान होते. स्कंद पुराण आणि जगन्नाथ शास्त्रानुसार, याच दिवशी महाप्रभू जगन्नाथ यांचा वाढदिवसदेखील असतो. त्यामुळे मंदिर पहाटे ३ वाजता उघडले जाते. दिवसभरातील सहा पूजाविधींनंतर देवाला गर्भगृहातून बाहेर आणण्याची प्रक्रिया सुरू होते.
मंदिराच्या २ किमी क्षेत्रात दारू-मांसावर बंदी
या वेळी पुरी प्रशासनाने स्नान पौर्णिमापासून रथयात्रेदरम्यान श्रीमंदिराच्या दोन किमी परिसरात दारू व मांस विक्रीवर बंदी घातली आहे. कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांच्या मते, बडदांड (श्रीमंदिरासमोरील भाग) मध्ये अनैतिक कृती होणार नाही.
रथयात्रेत तैनात असतील ७० प्लाटून जवान
२७ जून रोजी रथयात्रा होईल. सुरक्षेसाठी या वेळी ४ कमांडंट, ४५० पोलिस अधिकारी आणि ७० प्लाटून जवान तैनात असतील. रस्त्यात एआय आधारित फेस रिकग्निशन कॅमेरे बसवले जात आहेत.
वर्षात एकदा देवस्नानाच्या वेळी उघडते सोन्याची विहीर
तसेच या विहिरीची सेवा ‘सुना गोसाईं’ शतकांपासून करत आले आहेत. यंदाचे गोसाईं देवेंद्र नारायण ब्रह्मचारी यांनी सांगितले की, ही विहीर ४-५ फूट रुंद आणि चौकोनी आहे. तिच्या भिंतींवर सोन्याच्या विटा लावलेल्या आहेत. ही विहीर वर्षातून एकदा देवस्नानच्या वेळीच उघडली जाते. ती दोन टन वजनाच्या सिमेंट-लोखंडी झाकणाने झाकलेली आहे. स्नानानंतर देवाला गज भेष (हत्तीचा पोशाख) धारण करवला जातो. दिवसभर भक्तांना दर्शन दिल्यानंतर सायंकाळी देवाला अणसर गृहमध्ये प्रवेश करवून दरवाजे बंद केले जातात.
अशी मान्यता आहे की, स्नानानंतर देवाला १५ दिवस ताप येतो. ही खोली जगमोहनजवळच बनवलेली आहे. तापाच्या काळात महाप्रभूंच्या शरीरावर चंदन, कापूर, चुआ, कस्तुरीचा लेप लावतात. बिस्वाबाशुच्या वंशज दईतापती सेवक महाप्रभूंची सेवा करतात.
या खोलीत वीज नसते. येथे राशी तेलाचा एक दिवा लावला जातो आणि फुलांनी देवावर उपचार होतात. या काळात देवाला फक्त गोड पाणी भोग म्हणून दिले जाते. तेव्हा कोणतीही घंटा वाजवली जात नाही.





























