T20 विश्वचषक: टी-20 वर्ल्डकप स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे त्यानुसार क्रिकेट चाहत्यांची उत्कंठा ताणली जात आहे. भारतीय संघाने चारही सामने जिंकत सुपर 8 फेरी गाठली आहे. एकीकडे भारतीय संघ सलग सामने जिंकत असताना अभिषेक शर्माने एकही धाव न करणे, सोपे झेल सोडणे असे अनेक मुद्दे पुढील कामगिरीत अडथळा आणण्याची भीती आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने अभिषेक शर्माचा ‘स्लॉगर’ असा उल्लेख केल्यानंतर भारतीय संघाबाबत एक मोठं विधान केलं आहे. सुपर 8 मधील सर्व संघ निश्चित झाले असताना कोणते चार संघ सेमी-फायलनमध्ये जातील असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून कार्यक्रमाचा सूत्रसंचालकही आश्चर्यचकित झाल. आमीरच्या मते भारतीय संघ सेमी-फायनलमध्ये जाणार नाही. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ यशस्वी होतील असं मत त्याने मांडलं आहे.
मोहम्मद आमीरच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील एका आठवड्यापासून सोशल मीडियावर त्याच्या विधानाची चर्चा आहे. अभिषेक शर्माला स्लॉगर म्हटल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. यानंतर आता त्याने भारत टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडेल असं सांगत नव्याने टीकेला आमंत्रण दिलं आहे.
भारतीय संघ असणाऱ्या गटातून दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ सेमी-फायनलमध्ये जातील या विधानावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला की, “पाकिस्ताविरोधातील सामना वगळता भारतीय संघाच फलंदाजी सर्व सामन्यात ढासळली होती. ज्याप्रकारे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज खेळत आहेत ते पाहता ते कोणत्याही संघाला पराभूत करतील”.
भारतीय संघाच्या गटात झिम्बाब्वेदेखील आहे. मात्र फक्त दोनच संघ सेमी-फायनलमध्ये दाखल होणार आहेत.
मोहम्मद आमीरने अभिषेक शर्माबद्दल काय म्हटलं?
“मी जे काही थोडं फार पाहिलं आहे, त्याच्यावरुन तुम्ही मला विचारलं तर तो फक्त स्लॉगर आहे. त्याला प्रत्येक चेंडूवर फटका मारायचा असतो. ज्यादिवशी तो चांगला खेळतो तेव्हा सर्व काही ठीक असतं. पण त्याच्या अपयशाच्या शक्यता जास्त आहेत. तो 8 डावांपैकी एकामध्ये धावा करतो. अन्यथा त्याच्या धावा तुम्ही पाहिल्या तर त्या 10,15,0 आणि 20 आहेत. मला वाटत नाही की तो तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे,” असं मोहम्मद आमीरने ‘हारना मना है’ शोमध्ये म्हटलं आहे.
अभिषेक शर्मा सलग तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटने त्याला उघडं पाडलं आहे असंही तो म्हणाला. “सैमही जेव्हा पीएसएल खेळण्यासाठी आला होता तेव्हा असाच मुद्दा होता. तो नवा होता आणि न पाहता फटके लगावत होता. जर तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या स्टम्पवर चेंडू टाकला तर त्याला निर्णय घेताना त्रास होत असे. आपल्या शेवटच्या दोन सामन्यातही तो ऑफ साईडला खेळताना बाद झाला. तो आपला ऑफ साइड गेम सुधारत नाही तोवर तो प्रगती करु शकत नाही. चांगले गोलंदाज नेहमीच तुमच्यातील कमरतांची परीक्षा घेतात आणि तुमच्या कंफर्ट झोनच्या बाहेर नेतात,” असं तो म्हणाला.
“अभिषेक शर्माचंही तसंच आहे. तो प्रत्येक चेंडू आपल्या टप्प्यात येण्याची वाट पाहतो, जेणेकरुन मोठा फटका लगावता येईल. पण मोठ्या स्तरांवर किंवा एकदिवसीय सामन्यात प्रत्येक चेंडूवर फटका मारु शकत नाहीत. सलमान आघा आणि आर्यन दत्त यांना सारख्याच पद्धतीने त्याला बाद केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट तुम्हाला उघडं पाडतं,” असं त्याने म्हटलं.






























