IND vs NZ 2nd T20I नंतर इशान किशनने मोठे विधान केले आहे. 23 जानेवारी रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. एकीकडे 209 धावांचे आव्हान, दुसरीकडे अवघ्या 6 धावांत गमावलेले दोन महत्त्वाचे फलंदाज. असं असुनही अशा कठीण परिस्थितीत भारताचा डाव सावरला तो इशान किशनच्या आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळीमुळे. इशाने अवघ्या 32 चेंडूंमध्ये 76 धावांची स्फोटक खेळी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. त्याने टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने टीम कशी असावी हे दाखवून दिली. कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत उभारलेल्या शतकी भागीदारीने केवळ न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा आत्मविश्वासच मोडला नाही, तर इशान किशनच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पाही अधोरेखित केला. सामन्यानंतर त्याने स्वतःबद्दल केलेल्या आत्मपरीक्षणाबद्दलही मोठे विधान केले जे या खेळीइतकेच चर्चेत आले आहे.
इशानने कोणत्याही दबावात न येता केली खेळी
सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचे दोन फलंदाज अवघ्या 6 धावांत बाद झाले असतानाही इशानने कोणताही दबाव न घेता आक्रमक खेळ सुरू ठेवला. कर्णधार सूर्यकुमार यादव (37 चेंडूंमध्ये नाबाद 82 धावा) याच्यासोबत त्याने तिसऱ्या विकेटसाठी केवळ 49 चेंडूंमध्ये 122 धावांची निर्णायक भागीदारी रचली. या भागीदारीच्या जोरावर भारताने 209 धावांचे आव्हान फक्त 15.2 षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले.
काय म्हणाला इशान किशन
सामन्यानंतर पारितोषिक स्वीकारताना इशान किशन म्हणाला, “आज माझं लक्ष फक्त मी काय करायला हवं यावर होतं. मानसिकदृष्ट्या योग्य स्थितीत राहणं खूप महत्त्वाचं असतं. एकदा आपल्याला स्वतःच्या फॉर्मवर विश्वास वाटू लागला की, मग फक्त चेंडूकडे लक्ष द्यायचं आणि संयम राखत खेळायचं.” तो पुढे म्हणाला, “208 धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेमधील प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं होतं. त्यामुळे सुरुवातीपासूनच धावा वाढवण्याचा प्रयत्न करत होतो.”
मनातील भावना उघडपणे मांडल्या
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत राष्ट्रीय संघात पुनरागमन केलेल्या या डावखुऱ्या यष्टीरक्षक फलंदाजाने आपल्या मनातील भावना उघडपणे मांडल्या. “कधी कधी हे सगळं तुम्ही स्वतःसाठी करता. आपण खरंच भारताचं प्रतिनिधित्व करण्यास पात्र आहोत का?, या प्रश्नाचं उत्तर स्वतःलाच द्यावं लागतं. देशांतर्गत क्रिकेटमधून जो आत्मविश्वास मिळाला, तोच मी इथे घेऊन आलो आणि आजचा दिवस माझ्यासाठी खास ठरला,” असे इशान म्हणाला.
संघात पुनरागमनाबाबत काय म्हणाला इशान?
संघात पुनरागमनाबाबत विचारले असता तो म्हणाला, “मी स्वतःला एकच प्रश्न विचारला होता की, मी पुन्हा हे करू शकतो का? आणि उत्तर स्पष्ट होतं. मला खेळी सावरता येते, धावा करता येतात. बाद झालो तरी समाधानकारक क्रिकेट खेळायचंच, एवढंच मनात होतं.”





























