पुणे (दि. १९) : “राज्य महिला आयोगाने महिला वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला पुढाकार अत्यंत स्तुत्य आहे. वारीदरम्यान महिलांना मासिक पाळीच्या काळात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग यंत्रे, इन्सिनरेशन यंत्रे बसवण्याचे काम आदर्शवत आहे,” असे गौरवोद्गार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
निवडुंगा विठोबा मंदिर, पुणे येथे राज्य महिला आयोग व पुणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित ‘आरोग्य वारी’ उपक्रमाचे उद्घाटन श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, सचिव नंदिनी आवडे, पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, उपयुक्त संदीप कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासनाकडून वारीसाठी सुविधा वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. तसेच पंढरपूर येथे ७३ कोटी रुपये खर्चून दर्शनबारी उभारली जाणार असून, एकावेळी ६ हजार वारकऱ्यांना तेथे थांबता येणार आहे,” असे श्री. पाटील यांनी सांगितले. फिरते स्वच्छतागृह, स्वच्छतेवर भर आणि महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा यामुळे वारी अधिक सुलभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘स्वच्छ’ संस्थेच्या महिलांना ५ रुपयांना सॅनिटरी पॅड विक्रीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असून, केंद्र शासनाच्या योजनेद्वारे हे पॅड्स महिला भागधारकांना अडीच रुपयात मिळणार आहेत, अशी माहितीही श्री. पाटील यांनी दिली.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “महिलांनी सुरक्षिततेसाठी सजग राहणे आवश्यक आहे. टारगटपणाच्या घटना झाल्यास त्याचे १ मिनिटांचे व्हिडिओ काढून पोलिसांकडे पाठवावेत. महिलांची सुरक्षितता सर्वोच्च असून, यासाठी राज्य शासन आणि आयोग कटिबद्ध आहे.”

रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, गेली ४ वर्षे आरोग्य वारी उपक्रम राबवला जात आहे. “वारी मार्गावर दर १०-१२ किमीवर सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग व बर्निंग मशीन, हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. बीट मार्शल, टोल फ्री क्रमांक, वैद्यकीय मदत हे सर्व उपलब्ध आहे,” असे त्यांनी सांगितले.
आमदार चेतन तुपे यांनी पीएमपीएमएलच्या महिला वारकऱ्यांसाठी बस व्यवस्थेचे कौतुक केले. तर दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले की, “गर्दीच्या काळात सासवड, आळंदी, देहू मार्गावर जादा बसेस कार्यरत करण्यात आल्या आहेत.”
प्रास्ताविकात आयोगाच्या सचिव नंदिनी आवडे म्हणाल्या, “वारीमध्ये सहभागी होणाऱ्या महिला भगिनींच्या आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी आयोग विविध उपक्रम राबवत आहे. आरोग्य वारी म्हणजे भक्ती व आरोग्य यांचा संगम आहे.”
महानगरपालिकेचे उपायुक्त सुनील बल्लाळ यांनी माहिती दिली की, “महानगरपालिका हद्दीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर एकूण ४० ठिकाणी वैद्यकीय पथके सज्ज आहेत. हिरकणी कक्ष, अद्ययावत रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.”
कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. महिलांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सन्मानाच्या दृष्टीने या उपक्रमामुळे वारी अधिक सशक्त आणि प्रभावी ठरणार आहे, याविषयी उपस्थित मान्यवरांनी विश्वास व्यक्त केला.






























